समतोल ठेवत परिचारिका उत्तम काम करतात - सभापती डॉ. जितेश कदम
परिचारिका दिनानिमित्त शंभर जणांचे रक्तदान
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
रुग्णांच्या बाबतीत परिचारिका नेहमीच संवेदनशील असतात. माणसांप्रती त्यांच्या मनात सेवाभाव आहे. डॉक्टर, रुग्ण व नातेवाईक यांच्यात समतोल ठेवून त्या उत्तम काम करतात असे प्रतिपादन कडेगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम यांनी केले.
येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात आयोजित
जागतिक परिचारिका दिनात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमच्या परिचारिका, आमच्या भावी सक्षम परिचारिका जीव वाचवतात ही यावर्षीची थीम होती. भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. निलिमा भोरे, टीएनएआय राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ राठोड व डॉ. एम. आय. मोमीन प्रमुख उपस्थित होत्या. स्वागत नर्सिंग प्राचार्य डॉ. सुरेश रे यांनी केले.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन डॉ. जितेश कदम यांच्याहस्ते करण्यात आले. सुमारे १०० जणांनी रक्तदान केले. भारती हॉस्पिटलने रक्त संकलन केले. यामध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.
डॉ. जितेश कदम म्हणाले, टीएनए आज काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात ते फार मोठे पाऊल आहे. टीएनए सदस्य करण्यासाठी आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल. त्याचे शिबीर आयोजित करू. कुठलाही व्यक्ती विद्यार्थी म्हणून जगला पाहिजे. ती मानसिकता आपण ठेवली पाहिजे. बाहेर जाऊन आपला विद्यार्थी भारती विद्यापीठ म्हणून जातोय त्याचा आपल्याला अभिमान आहे. विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर आपसूकच आपलं आणि संस्थेचे नाव होते. न घाबरता तो सर्व प्रसंगाला सामोरा गेला पाहिजे. टीम वर्क महत्त्वाचे आहे.
नर्सिंगमध्ये काम केल्यास समाधान मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, स्टाफ नर्स, सेवक यांचाही सन्मान करण्यात आला.
टीएनए सांगली शाखेचा उद्घाटन सोहळा डॉ. राजाभाऊ राठोड यांनी कळ दाबून केला. टीएनए मार्फत अनेक योजना आहेत त्याचा फायदा घेण्याचे आवाहन राठोड यांनी केले.
शैक्षणिक संचालक डॉ. आर.बी. कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कामत, सरस्वती हेरवाडकर, वरदा सावर्डेकर डॉ. पल्लवी जमसांडेकर, श्वेता कुलकर्णी, प्राचार्य सुमन पवार यांच्यासह इतर नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यासह सर्व प्राध्यापक व परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लेटरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सुत्रसंचालन प्रा. अक्कमादेवी बेरगिरी आणि आभार प्रा. सतीश साळवी यांनी मानले.


